पेज

☀ राजीव गांधी

* राजीव गांधी
(२० ऑगस्ट १९४४ - २१ मे १९९१):-
      हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो.१९८४ ते २ डिसे. १८८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. (वय ४० वर्षे)
      राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंग्लंड एअरलाइन्स मध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते.दरम्यान इंग्लंडमधील
केंब्रिज येथे असतांना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. अखेर इ.स.१९८० मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते इ.स.१९८४ मध्ये पंतप्रधान बनले.
      राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरवात ही त्यांच्या धोरणांतून झाली.  इ.स.१९८८मध्ये त्यांनी श्रीलंकेत
शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती
लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली. याच सुमारास बोफोर्स घोटाळ्यात
 त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर इ.स.१९८९ च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
      राजीव गांधी त्यानंतरही कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम होते. इ.स.१९९१ च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी या राजकारणात आहेत.राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न
पुरस्कार प्रदान करण्यात आला.
       राजीव गांधीचा जन्म भारताच्या प्रसिद्ध राजकीय घराण्यात झाला.आजोबा
जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरू यांची मुलगी इंदिरा गांधी यांनी कॉंग्रेसचे एक सदस्य फिरोज गांधी यांच्या सोबत विवाह केला. इंदिरा गांधींनी इ.स.१९४४ मध्ये राजीव यांना जन्म दिला. याकाळात त्यांचे आईवडील स्वातंत्र्य लढयातील सहभागामुळे सतत तुरुंगात असत. अखेर इ.स.१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते अलाहाबाद (प्रयागराज) येथे स्थायिक झाले. पण इ.स.१९४९ च्या सुमारास इंदिरा व फिरोज यांच्यात दुरावा निर्माण झाला. इंदिरा मुलांसकट पित्याकडे दिल्लीला परतल्या व पुढेही पित्यासोबतच रहिल्या. इ.स.१९६० मध्ये फिरोज गांधींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
       राजीव गांधीचे सुरुवातीचे शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. इ.स.१९६१ ला पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. केंब्रिजमध्ये असताना इ.स.१९६५ च्या जानेवारीत त्यांचीओळख इटलीच्या
अँटोनीया माईनो (Antonia Maino - सोनिया गांधी) यांच्याशी झाली. पुढे इ.स. १९६८ मध्ये
 भारतात येऊन त्या दोघांनी विवाह केला. इ.स.१९६७ मध्ये आई इंदिरा या भारताच्या पंतप्रधान बनल्या तरी राजीव राजकारणापासू दूर रहात इंडियन एअरलाईन्स वैमानिक म्हणुन रुजू झाले. त्यांना इ.स.१९७० मध्ये राहुल तर इ.स.१९७२ मध्ये प्रियांका ही दोन अपत्ये झाली.
       इ.स.१९८० मध्ये लहान भाऊ संजय गांधी राजकारणात सक्रिय होता. त्याचा विमान अपघातात मृत्यु झाला. यानंतर आई आणि कॉंग्रेस पक्ष यांच्याकडून राजीव यांच्यावर राजकारणात उतरण्यासाठी दबाब येऊ लागला. राजीव व सोनिया दोघांचा राजकारणात येण्यास विरोध होताच, तशी जाहीर व्यक्तव्ये राजीव गांधीनी केली होती तरी पुढे विचार बदलून इ.स.१९८१ मध्ये त्यांनी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी लोकदलचे उमेदवार शरद यादव यांचा २ लाख मताधिक्याने पराभव केला. लवकरच ते आईचे प्रमुख सल्लागार तसेच युवक कॉंग्रेसचे प्रमुख बनले.
       ३१ ऑक्टोंबर इ.स.१९८४ रोजी इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधीवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. इंदिराजींची हत्या झाल्यावर दिल्लीत शीख विरोधी दंगली उसळल्या. सुमारे २७०० शीख यात मारले गेले. याबाबत कॉंग्रेस नेत्यांवर दंगली भडकवण्याचे आरोपही झाले. याबाबत दिल्लीत एका समारोहात राजीव गांधी काढलेले उद्गार पुढील प्रमाणे. “Some riots took place in the country following the murder of Indiraji. We know the people were very angry and for a few days it seemed that India had been shaken. But, when a mighty tree falls, it is only natural that the earth around it does shake a little.” जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा आजुबाजुची जमीन हादरणे सहाजिकच आहे. या व्यक्तव्यावरून राजीव गांधीवर प्रचंड टीका झाली. पंतप्रधानपदी निवड होताच राजीव गांधीनी लोकसभा बरखास्त करत निवडणुका घेतल्या. मोठया बहुमताने कॉंग्रेस निवडून आली. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदा झालाच.त्यांनी
रशिया सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि चीन यांसोबतही चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न केले.
      राजीव गांधीनी तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली.खासकरुन
संगणक, दूरसंचार क्षेत्र यात त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आयातीचे नियम शिथिल केले.
      २१ मे१९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचारसभेदरम्यान लिट्टे ने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या केली. "धनु" नावाची मुलगी राजीव गांधींच्या सभास्थानी स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत होती. राजीव गांधी जवळ येताच ती गर्दीतून पुढे येण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा राजीव गांधींच्या महिला सुरक्षारक्षकने तिला अडविले. पण राजीव गांधींनी त्या महिला रक्षकाला थांबवून धनूला जवळ येऊ दिले. धनु राजीव गांधींच्या पाया पडण्यास वाकली आणि तिने आपल्या कमरेला असणारी स्फोटके उडवून दिली. यात तिचा, राजीव गांधींचा आणि जवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला. लिट्टेने सुरवातीस जबाबदारी घेण्यास नकार दिला पण घटनास्थळाचे चित्रीकरण उपलब्ध झाल्यावर, इतर दहशतवाद्यांची ओळख पटवून माग घेण्यात आला. यामुळे लिट्टेने भारताची उरली सुरली सहानुभुती तर गमावलीच शिवाय लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणारा भारत पहिला देश ठरला. याचे अनुकरण करत ३२ देशांनी लिट्टेला दहशतवादी घोषित केले.

* संकलन *
 शरद शिंदे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा